Monday, February 1, 2021

आदिवासी क्षेत्रातील किल्ले

आदिवासी क्षेत्रातील किल्ले

 महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील ठाणे, पालघर तसेच उत्तरेकडील नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आदिवासीबहुल भाग आहे. अमरावती जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आणि गडचिरोली जिल्ह्यातदेखील आदिवासी वसाहती मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे गडकिल्ले हे या आदिवासीबहुल भागात शिवपूर्व काळापासून वसलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात या सर्व जिल्ह्यांपैकी फक्त नाशिक परिसरावर महाराजांची सत्ता होती. ठाणे, पालघर आणि डहाणू परिसरावर गुजरात सुलतान आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी राज्य केले होते. जव्हार या आदिवासीबहुल भागात भूपतगड आणि बळवंतगड असे दोन महत्वाचे डोंगरी किल्ले आहेत. भूपतगडावर आज तटबंदी तुरळक प्रमाणात शिल्लक असून खडकात खोदलेली पाण्याची टाकी आहेत. किल्ल्यावर बांधकामाचे जास्त अवशेष दिसत नाहीत. नाशिक परिसरातून उत्तर कोंकणात उतरणाऱ्या घाट मार्गावर हा किल्ला बांधलेला आहे. बळवंतगड हा देखील कसारा घाट, थळ घाट या परिसरावर नजर ठेवण्यासाठी बांधता होता. शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोन वेळा छापा घातला होता दोनही वेळेला ही लूट घेऊन येताना महाराजांनी जव्हार परिसरातील अशेरी, असावा, काळदुर्ग, गंभीरगड, सेगवा, या किल्ल्यांवर मुक्काम केला होता अशी दंतकथा जवळजवळ प्रत्येक किल्ल्याच्या परिसरात सांगितली जाते. अशेरी हा एकमेव मोठा डोंगरी किल्ला पोर्तुगीजांनी डहाणूजवळ बांधला. खडकवणे किंवा खाड्कोन हे छोट्या वस्तीचे गाव किल्ल्याच्या पायथ्याला आहे गावातून गडाची उंची साधारणत: 350 मीटर आहे. गावात प्रवेश करतानाच गावाच्या वेशीवर लाकडामध्ये कोरुन काढलेला एक खांब दिसतो. या खांबावर वाघाचे आणि चंद्र-सूर्याचे शिल्प कोरलेले आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गावाचे पंचमहाभूतांपासून संरक्षण व्हावे म्हणून असा खांब वेशीवर उभा केला जातो. याच स्वरुपाचा लाकडी स्तंभ जव्हारच्या पूर्वेकडील भागात असलेल्या वाघेरा या किल्ल्याच्या पायथ्याला आहे. खैराई हा एक उंच किल्ला त्रिंबकेश्वर ते सिल्वासा या वाटेवरील ठाणपाडा आणि खैराईपाली या गावाजवळील डोंगरावर आहे. गडावर वेताळाचे मंदिर असून पाण्यासाठी तीन टाकी आहेत. गडाचा दरवाजा पडलेला असूनही त्याचे अवशेष दिसतात. नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून तो गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला आहे. गडकिल्ले म्हटले की, डोळ्यासमोर पश्चिम महाराष्ट्र, सह्याद्री पठार आणि कोकण हाच प्रदेश डोळ्यासमोर येतो. पण नंदुरबारसारख्या अत्यंत दुर्गम आणि सोयीसुविधा नसलेल्या भागामध्ये देखील एके काळी सुबत्ता होती हे तेथील गडकिल्ले आणि त्यावरील वास्तू पाहून समजते. नंदुरबार जिल्ह्यातून तापी ही एक मोठी नदी वाहते. तापी नदीमुळे या जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग झालेले आहेत. उत्तर नंदुरबारच्या सीमेवरुन नर्मदा नदी वाहते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डोंगरी किल्ले फारच कमी आहेत. पण विशेषत: भुईकोट किल्ल्यांची संख्या या भागात जास्त आहे. 14 आणि 15 व्या शतकात हा भाग फारुखी राजसत्तेकडे होता. अहमदनगर, परांडा, औसा यासारखे भुईकोट किल्ले नंदुरबार जिल्ह्यात तुलनेने कमी आहेत. धडगाव हा किल्ला उत्तर नंदुरबार जिल्ह्यात येत असून या किल्ल्यावर तटबंदी, जंग्या, दरवाजे यांसारखे अनेक अवशेष दिसून येतात. चौगाव हा एक छोटा पण डोंगरी किल्ला या आदिवासी बहुल भागात आहे. याची उंची साधारणत: 50 मीटर असून किल्ल्याचे सर्व अवशेष हे पायथ्यापासून ते गडमाथ्यापर्यंत बांधलेले दिसतात. सुलतानपूर, फतेहपूर यासारख्या काही गावांनाच तटबंदी बांधलेली आहे. त्याच्या वेशीवर दरवाजे आहेत. चोपडा, शिरपूर या भागात गढी या प्रकारातील बांधकाम अनेक ठिकाणी दिसते. गडचिरोली हा जिल्हा आदिवासीबहुल असून या भागातील लोकांची स्वत:ची विशिष्ट अशी संस्कृती आहे. या लोकांची स्थानिक दैवते आहेत. यामध्ये आपल्याला शिव, विष्णू, महिषासुरमर्दिनी यासारख्या देवतांच्या मूर्ती दिसणार नाहीत. ढोलाच्या तालावर येथील लोक विशिष्ट प्रकारचे नृत्य करताना दिसतात. या परिसरात घनदाट जंगल असल्याने आदिवासी जमातीचे वास्तव्य हे जंगलातच दिसून येते. साधारणत: 6-7 व्या शतकात या भूभागावर राष्ट्रकूट राजांचे राज्य होते. 11-12 व्या शतकात देवगिरीचे यादव यांनी या प्रदेशावर सत्ता प्रस्थापित झाली. त्यानंतर येथे गोड राजांनी राज्य केले. बल्लारशाह या राजाने चंद्रपूर ही आपली राजधानी केली. चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासीबहुल भागात मध्ययुगीन कालखंडात साधारणत: 20 किल्ले बांधले गेले. वैरागड, सुरजागड, टिपागड, राजोली, इ. किल्ले घनदाट जंगलात वसलेले असल्यामुळे सध्या तेथपर्यंत पोहोचणे सहज शक्य नाही. यापैकी सूरजागड आणि राजोली हे गिरिदुर्ग प्रकारातील किल्ले आहेत. सुरजागडचा माथा सपाट असून तेथे आजही तटबंदी, दरवाजे, वाडे यांचे अवशेष पाहता येतात. हे सर्व अवशेष आज दाट झाडीमध्ये लपलेले आहेत. सुरजागड किल्ल्यावर स्थानिक लोकांचे ठाकूरदेव हे दैवत आहे. टिपागड हा अजून एक महत्त्वाचा किल्ला गडचिरोली या आदिवासीबहुल भागात येतो. टिपा या शब्दाचा गोंड भाषेत अर्थ द्वीप असा होतो. पूरमशाह नावाचा गोंड राजा येथे राज्य करीत होता आणि त्याने आजच्या छत्तीसगडचा बराच भाग जिंकला होता. विदर्भातील अमरावती या जिल्ह्याच्या उत्तरेला मेळघाट हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. याच परिसरात गाविलगड आणि नरनाळा हे प्रचंड मोठा विस्तार असलेले किल्ले आहेत. मेळघाट या घनदाट जंगलात कोरकू, गोंड, निहल, बालाई अशा विविध आदिवासी वसाहती आहेत. नरनाळा हा विदर्भातील गिरिदुर्ग अकोला जिल्ह्यातील अकोट शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेत स्थित आहे. 15 व्या शतकात हा किल्ला बहामनी राजाच्या ताब्यात होता. किल्ल्याच्या तटबंदीस अनेक बुरुज आणि लहानमोठे दरवाजे होते. परंतु आता मोजकीच बांधकामे सुस्थितीत आहेत आणि ती देखील वेगवेगळ्या काळात बांधली गेली आहेत. दिल्ली दरवाजा, आकोट दरवाजा, शिरपूर दरवाजा, शहानुर दरवाजा ही गडाची मुख्य प्रवेशद्वारे आहेत. औरंगजेबाच्या काळातील तोफसुद्धा आहे हे त्यावरील कोरलेल्या लेखातून कळते. किल्ल्यात तलाव बांधून पिण्याच्या पाण्याची अगदी उत्तम व्यवस्था केलेली दिसते. किल्ल्यात अनेक भग्न इमारती आहेत त्यात राणीचा महल हा भव्य व मजबूत अशी वास्तू आहे. गावितगड हा अजून एक गिरिदुर्ग अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या घनदाट जंगलात बांधलेला दिसतो. सर्वप्रथम हा दुर्ग गवळी लोकांनी माती आणि दगड याचा वापर करुन बांधला होता व त्याला गवळीतट हे नाव दिले होते असे म्हणतात. या किल्ल्याच्या बांधणीचा काळ निश्चित सांगता येत नाही. किल्ल्यात अनेक बांधकामे केलेली होती. पण ती आता भग्न स्वरुपात आहेत. त्यामध्ये मंदिर, तलाव, राणीमहाल, समाध्या, मशिदी आणि इतर छोटी मोठी बांधकामे होती. यामध्ये दिल्ली दरवाजा हे अतिशय भव्य असे प्रवेशद्वार आहे त्यावर एक लेख कोरलेला आहे. किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर सिंह व हत्ती असलेले शिल्पांकन कोरलेले दिसतात. गडाची तटबंदी आणि बुरुज असूनही चांगल्या स्थितीत आहेत. 

 लेखक - डॉ.सचिन जोशी 
(लेखक पुणे येथील डेक्कन महाविद्यालयात पुरातत्व विभागात संशोधक आहेत.)

Thursday, January 28, 2021

सातमाळा डोंगररांगा, महाराष्ट्र.

 

सातमाळा

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीचा एक फाटा. दख्खनच्या पठारी प्रदेशाच्या पश्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्री (पश्चिम घाट) या पर्वतश्रेणीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेस किंवा आग्नेयीस अनेक डोंगररांगा किंवा सह्याद्रीचे फाटे गेलेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सीमेअंतर्गत तापी-पूर्णेच्या दक्षिणेस सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेवाचे डोंगर या तीन प्रमुख डोंगररांगा आहेत [⟶ बालाघाट; महादेवाचे डोंगर]. उत्तरेकडील तापी व दक्षिणेकडील गोदावरी नदी यांदरम्यान सातमाळा-अजिंठा, उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस भीमा नदी यांदरम्यान हरिश्चंद्रगड-बालाघाट, तर उत्तरेस भीमा व दक्षिणेस कृष्णा नदी यांदरम्यान महादेवाचे डोंगर आहेत. सह्याद्रीच्या मुख्य समूहात या सर्व श्रेण्यांचा प्रारंभ होत असून त्या पूर्व किंवा आग्नेय दिशेस पसरल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातील या प्रमुख डोंगररांगांपैकी सर्वांत उत्तरेकडील, साधारणतः पश्चिम-पूर्व दिशेस पसरलेल्या तापी व गोदावरी यांदरम्यानच्या, डोंगररांगा ‘सातमाळा-अजिंठा’ या नावाने ओळखल्या जातात. सामान्यपणे या डोंगररांगांच्या पश्चिमेकडील भागास सातमाळा व पूर्वेकडील भागास अजिंठ्याचे डोंगर असे संबोधले जाते. सातमाळा डोंगररांगांना चांदवड, चांदोर किंवा इंध्याद्री म्हणूनही ओळखतात. या डोंगररांगांचा प्रारंभ नासिक जिल्ह्याच्या वायव्य भागामध्ये सह्याद्रीच्या मुख्य समूहात होतो. मुख्य सह्याद्रीपासून पूर्वेस ८० किमी. पर्यंत बेसॉल्ट खडकातील विलक्षण अशा कटक व सुळक्यांच्या स्वरूपात ही रांग पसरली आहे. मनमाडजवळील मंद उताराच्या खळग्यानंतर पुन्हा या डोंगररांगा मैदानी भागापासून १८२ मी. उंचीपर्यंत वाढत गेलेल्या आहेत. अजिंठ्याच्या पुढे काही किमी.वर या डोंगररांगा दक्षिणेस वळून पठारी प्रदेशात विलीन होतात. नांदेड जिल्ह्यातील यांच्या विस्तारित डोंगररांगांना निर्मळ आणि सातमाळा डोंगररांगा असे म्हणतात. यांचा विस्तार पुढे आंध्र प्रदेशात झालेला दिसतो.

नासिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांत सातमाळा-अजिंठा डोंगररांगांचे फाटे पसरले आहेत. नासिक जिल्ह्याच्या साधारण मध्यातून या डोंगररांगा गेल्या असून तेथे त्यांची सस.पासून सरासरी उंची १,१००–१,३५० मी. दरम्यान आढळते. धोडप व सप्तशृंगीसारखी काही शिखरे सस.पासून १,४००मी. पेक्षा उंच आहेत. अचल व जावाता हे किल्ले या रांगेत आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून गेलेल्या या डोंगररांगांना अजिंठ्याचे डोंगर असे म्हणतात. अंजिठा, पाटणा, चांदोर येथील डोंगरकपाऱ्यांत कोरलेली बौद्घ लेणी ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या साधारण मध्यातून या डोंगररांगा गेलेल्या आहेत.

सातमाळा डोंगररांगामध्ये काही अरण्यांचे पट्टे आढळतात. काही भागांतील डोंगरांचे उतार उघडे असून काही भागांत विखुरलेल्या वनस्पती पहावयास मिळतात. डोंगररांगांच्या दरम्यान असलेल्या प्रवाहांच्या पात्रांत व काठावरील भागात दाट झाडी व झुडूपे आढळतात. प्रामुख्याने उष्णकटबंधीय शुष्क पानझडी प्रकारची वृक्षराजी या भागात आढळते. साग, ऐन, हिरडा, कुसुम, आवळा, पळस, खैर, शिसव, अंजन, शिरीष, शेवरी इ. वृक्षप्रकार येथील जंगलांत पहावयास मिळतात. अरण्यमय प्रदेशात वन्य पशु-पक्षी आढळतात. वाघ, कोल्हा, रानडुक्कर, ससा, भेकर, मुंगूस, काळवीट, सायाळ इ. प्राणी व मोर, रानकोंबडा, चंडोल, पोपट, कोकिळ, ससाणा, दयाळ इ. पक्षीही तेथे आढळतात.

सातमाळा डोंगररांगांपैकी उत्तरेकडील काही सोंडींच्या उताराच्या भागात तसेच मुख्य रांगेच्या पायथ्यापर्यंत लागवडीखालील क्षेत्र आहे. या डोंगररांगांमध्ये भिल्ल, गोंड, परधान, कोलाम या आदिवासी जमातींचे लोक राहतात. चाळीसगावजवळील रांजणगाव किंवा औलाम खिंड आणि अंजिठा खिंड या दोन खिंडींमधून प्रमुख मार्ग गेलेले आहेत. पश्चिमेकडील डोंगररांगांमध्ये निसर्गसुंदर गिरिस्थाने आढळतात.

विंध्य पर्वताच्या पश्चिमेस मध्य प्रदेश व गुजरात राज्यांच्या सरहद्दीदरम्यान असणाऱ्या डोंगररांगांनाही सातमाळा या नावाने ओळखले जाते.


चौधरी, वसंत

राजमाता जिजाऊ.


राजमाता जिजाऊ



राजमाता जिजाऊ

जिच्‍या हाती पाळण्‍याची दोरी ती जगाला उध्‍दारी उद्धृत केलेल्या ओळी म्हणजे मातृत्वाच्या महन्मंगल अविष्काराच्या परमोच्च क्षणाचा सुंदर रेखीव नमुनाच! युगपुरुष शिवराय घडले, वाढले आणि 'निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमत योगी।' असे ज्यांचे वर्णन केले जाते, ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची! राजमाता जिजाऊसाहेबांनी शिवनेरीच्या अंगाखांदयावर लहानाचा मोठा करताना, सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावरायला, शिकविताना शिवरायांना महाभारत आणि रामायणातील 'राम आणि कृष्णांच्या' गोष्टींचे बोधामृत पाजताना स्वराज्यस्थापनेचे बाळकडू पाजले. 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे' त्या मूलमंत्राचा उतरविला, ती मातृत्वशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ. १२ जानेवारी १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे गिरिजाबाई व लखुजी जाधवांच्या पोटी जे अद्वतीय कन्यारत्न जन्माला आले ते म्हणजे जिजाऊ आणि ही गुणी पोर, बाबाजी आणि शहाजी भोसल्यांची अर्धांगिनी झाली ती १६०५ च्या रंगपंचमीला अर्थात फाल्गुन वदय पंचमीला. त्या भोसले घराण्याला 'पृष्णेश्वर'मंदिराच्या जीणोंद्धाराचे श्रेय जाते. जिचे वर्णन 'शिवभारत २-४५' मध्ये केले 'गड:गेव गुणगम्भीरा व्यराजत महोदधिन् (अर्थात गुणगंभीर अशी गंगा समुद्राला शोभून दिसते, तशी जिजाबाई शहाजीला शोभली.) 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' तद्वतच युगपुरुष घडत असताना ते बीज आणि त्यावर होणारे संस्कार यांचा अन्योन्य संबंध होता. कारण शिवबांच्या जन्माच्या पार्श्वभूमीचा विचार करताना हा गर्भ जिजाऊंच्या उदरी वाढत असताना काय परिस्थिती होती? सभोवताली किंवा उभ्या महाराष्ट्रात. जाधव आणि भोसले या घराण्यांची सोयरीक जुळली खरी; पण मने मात्र जुळली नाहीत, त्यामुळे जिजाबाईंना फार वाईट वाटे. एका अकल्पित प्रसंगी जाधव व भोसले घराण्यात युद्धही जुपले. महाराष्ट्रात आणि सर्वत्र मोगल आणि विजापूरचे सुलतान यांनी धुमाकूळ घातला होता. जिजाबाईंना असह्य होई. मराठ्यांच्या संसाराची, प्रदेशांची आणि तीर्थक्षेत्रांची दैना पाहून जिजाबाईंच्या हृदयाला पीळ 'झगडणे आणि संघर्ष’ हा त्यांच्या जीवनाचा पायाच होता. शिवबाच्या जन्मापासून प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याशी करताना त्या डगमगल्या नाहीत. ही माता ह्या पुत्राच्या समयी गरोदर असताना घोड्यावर मांड देऊन शिवनेरीच्या दिशेने घौडदोड करणारी ही माता, तिने स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढच रोवली असे म्हणावे लागेल. अस्मानी सुलतानी. संकटाची बिकट वाट सगळीकडे असताना ही धुरंधर माता किल्ले शिवनेरीवर विसावली आणि ह्या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन ‘शिवाई' देवीचा  कृपाप्रसाद म्‍हणून शिवाजी नामकरण करून त्‍यास इतिहासाचे बाळकडू पाजले, पुण्‍याच्‍या लालमहालात प्रवेश केल्‍यावर पुणे भूमी सोन्‍याच्‍या नांगराने नांगरून येथील आपल्‍या अस्तित्‍वाच्‍या पाऊलखुणा त्‍यांनीच उमटविल्‍या असेच म्‍हणावे लागेल.

प्रसंग रांझयाच्‍या पाटलाचा असो त्‍यात न्‍यायनिवाडा करण्‍याचे प्रशिक्षण मिळाले ते राजमाता जिजाबाईकडूनच.  न्‍यायासनासमोर आपलाच अधिकारी गुंन्‍हेगार  म्‍हणून आल्‍यावर कारवाई करण्याचे प्रशिक्षण मिळाले. निःस्पृह आणि नि:स्वार्थी आंबे तोडल्याचा व त्यावर उपाय म्हणून आयुष्यभर अधीं बाहीचा शर्ट वापरण्याचे ब्रीद पाळणा-या दादोजींची निवड ह्यात त्यांच्या मुत्सद्देगिरीचा भाग जाणवतो. पतीच्या अनुपस्थितीत मुसलमानी राजवटीविरुद्ध बाल शिवाजी व मावळ्यांमध्ये 'स्वराज्य स्थापना'चे बीज रोवून 'हिंदवी स्वराज्याचे' महान स्वप्न पाहण्याचे योगदान देणारी ती माऊली म्हणजे, 'स्त्री क्षणकालची पत्नी व अनंतकालची माता असते' हे शब्दशः खरे करून त्यांनी आपल्या पुत्राच्या कर्तृत्वात स्वत:चे योगदान दिले. A low aim is a crime' हे तत्त्व लक्षात घेऊन स्वराज्यनिर्मितीचे भव्य दिव्य स्वप्न उराशी बाळगले.

तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण बांधल्यावर, रायरेश्वराच्या प्रतिज्ञेने या नव्या युगाचा उदय घडवून आणायला प्रेरक ठरल्या त्या एकमेव जिजाऊ माँसाहेब! म्हणतात त्याप्रमाणे, ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी'

हे वाक्य शिवराय सार्थ ठरवू शकले ते केवळ माँ साहेबांच्या करारी व नि:पक्षपाती स्वभावाचा त्यांच्यात उतरलेला अंश म्हणूनच! नेताजी पालकरांचे धर्मातर घडवून ह्या वीराच्या घरी स्वत: जाऊन सांत्वन करण्यात किंवा दूरदृष्टीने कोंढण्याचे स्वराज्यातील महत्व ओळखण्यातच ह्या मातेचे योगदान होते. आग्रा सुटका - प्रसंगानंतर बैराग्याच्या वेषात आलेल्या प्रतापराव गुजर ह्यांना सोन्याचे कडे कबूल करून त्या देणा-या राजमाता जिजाऊ होत्या, म्हणूनच हे हिंदवी स्वराज्याचे तारू राज्यभिषेकाच्या काठावर पोहोचले.

पुण्यात राहण्यासाठी आल्यावर त्यांनी कसब्यात गणपतीची स्थापना केली व जोगेश्वरी आणि केदारेश्वर यांचा जीणोंद्धार केला. जिजाबाई शिवाजीच्या मनावर सतत एक गोष्ट बिंबवीत राहिल्या की, 'हे राज्य आमचे नाही, इथे लोक कंगाल आहेत, देवळे पाडली जात आहेत. गोरगरिबांना वाली उरलेला नाही, शिवबा, तू मोठा हो, यांचा पालनवाला हो.”

तत्कालीन राजकारणात आणि समाजकारणात जिजाबाई सतत लक्ष घालीत. जाती-जमातीत व घराण्यांन्यायनिवडांच्या बाबतीत त्या नि:पक्षपाती होत्या. संतमहंतांचा आणि विद्वानांचा त्या योग्य परामर्श घेत असत. परिणामतः संत तुकाराम यांसारखे आध्यात्मिक अधिष्ठान लाभले हा त्यांचाच दृश्य परिणाम होता.

अफजलखानाचे संकट आणि सिद्दी जोहरने पन्हाळ्याला दिलेला वेढा हे जिजाबाईंच्या जीवनातील पडले होते. संभाजी व शिवाजी जगले आणि त्यातील शिवाजीवर हे अफजलखानाचे संकट! पण अशाही स्थितीत मन कठोर करून त्यांनी शिवाजींना आशीर्वाद दिला.

'शिवबा तू विजयी होशील!’

पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेल्या शिवाजींना मुक्त करण्यासाठी स्वतःच युद्धावर निघाल्या होत्या; पण नेताजी पालकर यांनी त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त केले. या प्रसंगात त्यांची पुत्रप्रेमाची आर्तता आणि विलक्षण आवेश गोष्टी दिसून येतात. इ. स. १६६४ साली दोदिगिरीच्या अरण्यात शहाजी राजांना अपघात झाला आणि ते निवर्तले, हा वज्राघात झेलून त्या सती जायला निघाल्या होत्या, पण शिवाजी राजांनी विनवणी करून त्यांना या निश्चयापासून परावृत्त केले. जिजाबाईंच्या अंगी अनेक चांगले गुण होते. त्या कर्तबगार सर्व राज्यकारभार त्यांच्या स्वाधीन केला होता. जिजाबाई ह्या ‘युगपुरुष घडविला जिने खास राज्याचे उभारले तोरण अदमास शिवनेरीच्या भूवरती, सह्याद्रीच्या कुशीत, उदयास आले एक अनमोल रत्न! उभारली हिंदवी स्वराज्याची गुढी फलदुप झाली जिजाऊंची स्वप्ने वेडी. तिच्या योगदानाची किती वर्णावी महती तिच्या प्रत्येक कृतीतूनच झाली स्वराज्याची स्वप्ननिर्मिती!'

स्त्रोत :शिक्षण संक्रमण , जानेवारी २०१७

Sunday, January 24, 2021

शिवनेरी किल्ला, महाराष्ट्र.


शिवजन्म स्थळ, किल्ले शिवनेर.


शिवनेरी किल्ला  - ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.


इतिहास

‘जीर्णनगर’. ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरवल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला इ.स.अ १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरुद्धा येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्याकडे हस्तांतरीत करण्यात आला


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणेे
सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाटसोडून उजव्या पूढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे’ मंदिर लागते मंदीराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. जिजाउंच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आवीर्भातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा; मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलॊत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी पाण्याचे टाके’ आहे येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे. गड फिरण्यास २ तास पुरतात. वर किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो.

गडावर जाण्याच्या वाटा


गडावर जाण्याच एदोन प्रमुख मार्ग जून्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.

साखळीची वाट
या वाटेने गडावर यायच एझाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरसमोर जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळाट खोदलेल्या पाऱ्यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.

सात दरवाज्यांची वाट

शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायऱ्यांपाशी घेऊन जातो . या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महारदवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा, या मार्गेकिल्ल्याव्र पोहचण्यासाठी दीड तास लागतो.

मुंबईहून माळशेज मार्गे

जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटवर ‘शिवनेरी १९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेशा खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास एक दिवस लागतो.

या किल्ल्यावर शिवकुंजाच्या मागील बाजूस असणाऱ्या वऱ्हांड्यामध्ये १० ते १२ जणांची रहाण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वतःच करावी. गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारामही पिण्याचे पाणि उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी साखळीच्या मार्गेपाउण तास, सात दरवाजा मार्गे दीड तास लागतो.

माहिती संकलन - अमरीन पठाण


कृपया ब्लॉगला सबस्क्राईब/फॉलो करा म्हणजे पुढिल पोस्टचे अपडेट्स तुम्हाला मिळतील.

Saturday, January 23, 2021

शहाजीराजे भोसले स्मृतीदिन २३ जानेवारी १६६४

 

शहाजीराजे

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील व निजामशाही – आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार. ऐतिहासिक कागदपत्रांत त्यांचा शाहजी किंवा स्याहजी असाही नामोल्लेख आढळतो. त्यांच्या जन्मतारखेविषयी एकमत नाही. बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपूर येथील उपलब्ध जन्मपत्रिकांतील तारीख (१६ मार्च १५९९) ग्राह्य धरतात.

आज २३ जानेवारी शहाजीराजे भोसले यांचा स्मृति दिवस त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न.

भोसले घराण्यातील मालोजी व उमाबाई या दांपत्यापोटी शहाजींचा जन्म झाला. शरीफजी हा शहाजींचा धाकटा भाऊ. मालोजी हे निजामशाहीच्या नोकरीतील एक सरदार. भोसल्यांकडे हिंगणी, देऊळगाव, बेरडी इ. गावांची पाटीलकी होती. मालोजी १६१०-११ दरम्यान इंदापूर येथे झालेल्या एका लढाईत मारले गेले. तेव्हा निजामशाहीने मालोजींचा ‘मोकासा’ त्यांच्या मुलांना दिला. मालोजींचा भाऊ विठोजी यांनी मुलांचे संगोपन केले.

पुढे विठोजींच्या मृत्यूनंतर (१६२३) शहाजी स्वतःच मोकाशाचा कारभार पाहू लागले. शहाजींचा पहिला विवाह निजामशाहीतील एक सरदार व सिंदखेडचे पिढीजात देशमुख लखूजी जाधव यांच्या  जिजाबाई या कन्येशी झाला (१६०९). त्यांना सहा अपत्ये झाली.त्यांपैकी संभाजी व शिवाजी वगळता अन्य अपत्ये अल्पायुषी ठरली.

संभाजी कर्नाटकात कनकगिरीच्या लढाईत (१६५४) मरण पावले. तुकाबाई आणि नरसाबाई या शहाजींच्या आणखी दोन बायका. शहाजींचे दुसरे लग्न मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी झाले. त्यांचे पुत्र व्यंकोजीराजे पुढे तंजावरच्या गादीवर आले.

हाजींनी निजामशाहीचा वझीर मलिक अंबर याला सहकार्य करून आदिलशाहीविरुद्धच्या भातवडीच्या लढाईत पराक्रम केला (१६२४); मात्र त्यात त्यांचे भाऊ शरीफजी धारातीर्थी पडले. त्यानंतर मलिक अंबर आणि शहाजी यांच्या आपापसांतील मतभेदांमुळे शहाजी निजामशाही सोडून आदिलशाहीस मिळाले; परंतु १६२७ मध्ये इब्राहिम आदिलशाहच्या मृत्यूनंतर पुन्हा ते निजामशाहीत आले (१६२८).

निजामशाहीत सासरे लखूजी यांचा खून झाल्यानंतर शहाजी काही दिवस चाकण-पुणे परगण्यांत जाऊन राहिले आणि नंतर मोगलांकडे गेले. मोगलांनी त्यांना पाच हजारी मनसबदार नेमले; परंतु शाहजहान बादशाहाचा निजामशाही बुडविण्याचा हेतू लक्षात येताच शहाजींनी मोगलांना सोडून निजामशाही कुळातील एका मुलास गादीवर बसवून पेणगिरीस निजामशाहीची स्वतंत्र सत्ता स्थापन केली (१६३२). त्यासाठी त्यांनी विजापूरकरांशी मैत्रीचा तह केला.

शहाजींनी दक्षिणेत नीरेपासून उत्तरेत चांदवडच्या डोंगरापर्यंतच प्रदेश आणि पूर्वेस अहमदनगरपासून पश्चिमेस उत्तर कोकणापर्यंतचा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. निजामशाही टिकविण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले; तथापि शाहजहानने अखेर निजामशाही खालसा केली (१६३६). त्यानंतर शहाजींनी आदिलशाहीत नोकरी धरली (१६३६). आदिलशहाने त्यांना ‘सरलष्कर’ व ‘महाराज’ या पदव्या दिल्या. आदिलशहाने त्यांच्याकडे असलेले पुणे-सुपे ही जहागीर तशीच ठेवली. त्यानंतर शहाजींनी प्रदेश विस्ताराचे धोरण अंगीकारून आपले वर्चस्व वाढविले. तेव्हा मुहंमद आदिलशहाने कर्नाटकात जहागीर देऊन तिकडे त्यांची रवानगी केली (१६३७).

र्नाटकात पेनुकोंडे, बसवपटनम, होस्पेट, बिदनूर, श्रीरंगपटण वगैरे ठिकाणांच्या पाळेगारांविरुद्ध शहाजींनी मोहिमा आखून तो प्रदेश आदिलशाही अमलाखाली आणला (१६३७– ४८). या कामगिरीबद्दल त्यांना बंगलोरची जहागीर देण्यात आली. ते दुसरी पत्नी तुकाबाईंसह बंगलोरला राहू लागले. `महाराज फर्जंद शहाजी भोसले’ या किताबाने आदिलशहाने त्यांचा सन्मान केला. शिवाजींच्या स्वराज्यविषयक हालचालींमुळे आदिलशहा, मोगल व शहाजी ह्यांत वितुष्ट आले. शहाजी व शिवाजी यांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाजी जिंजीच्या वेढ्यात गुंतले असता त्यांना २६ जुलै १६४८ रोजी अचानक कैद करण्यात आले.

शिवाजी महाराजांनी शाहजहानचा मुलगा मुराद याच्या मार्फत आदिलशहावर दबाव आणून शहाजींची सुटका केली (१६ मे १६४९). ह्या बदल्यात संभाजींना बंगलोर व शिवाजींना कोंडाणा (सिंहगड) आदिलशहाला द्यावे लागले. सुटकेनंतर शहाजींकडे पूर्ववत कर्नाटकचा कारभार सोपविण्यात आला. त्यांनी नलेंगापट्टम, पाटॉनोव्हो, तंजावर, वेल्लोर वगैरे गावे हस्तगत करून जणू स्वतंत्र राज्य निर्माण केले होते. कर्नाटकात कोलार, बंगलोर, अर्काट, बाळापूर व शिरे हे भाग त्यांना आदिलशहाकडून जहागीर म्हणून मिळाले. त्यांनी सर्व हिंदू पाळेगारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला.

मुद्‌गलचा पाळेगार जंजाप्पा नाईक व तंजावरचा जमीनदार पंचीरागू यांचे वैमनस्य होते. जंजाप्पाने शहाजींच्या मदतीने पंचीरागूचा पराभव करून त्याचा प्रदेश काबीज केला; पण पुढे दोघांत वितुष्ट आले. तेव्हा शहाजींनी जंजाप्पास बाजूला सारून तंजावर व मुद्‌गल येथील कारभार व्यंकोजींच्या स्वाधीन केला. अनेक विद्वान, कवी इ. शहाजींच्या आश्रयास होते. त्यांच्या अंगी पराक्रम, मुत्सद्दीपणा, धाडस आणि हिंमत होती; पण त्यांचे सर्व आयुष्य मुसलमानी सत्ताधाऱ्यांच्या सेवेत गेले.

शिमोगा जिल्ह्यातील होदिगेरे येथे शिकारीस गेले असता घोड्यावरून पडून ते मरण पावले. व्यंकोजींनी होदिगेरे येथे त्यांच्या स्मृत्यर्थ वृंदावन बांधले. शिखर शिंगणापूर येथे त्यांच्या स्मृत्यर्थ एक प्रतीकात्मक वृंदावन आहे.



अंजनेरी, नाशिक.


 

त्र्यंबकेश्वर जवळ हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून ओळखला जाणारा अंजनेरी पर्वत देव दर्शनाच्या दृष्टीनं जितका महत्त्वाचा तितकाच ट्रेकींगचा थ्रिलिंग अनुभव देणारा. नाशिक-त्र्यंबक मार्गाच्या साधारणपणे ३० किलोमीटर अंतरावर अंजनेरीला जाण्यासाठी फाटा आहे. मारूतीरायाचं दर्शन घेतल्यावर अंजनेरी पर्वत चढाईसाठी मार्गक्रमण सुरू होतं. रस्त्यात लागणारं अंजनेरी गाव ओलांडून अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी येताच या डोंगराची विशालता लक्षात येते. अंजनेरी गावातून किल्ल्यावर पोहोचताच वाटेतच म्हणजे पाय-यांच्या ठिकाणी गुहेत जैनधर्मीय लेणी आढळतात. काही अंतरावर अंजनी मातेचे मंदिर असून ते ब-यापैकी प्रशस्त असल्यामुळे मुक्काम करण्यास योग्य आहे. थोडे पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. एक डावीकडे सीता गुहेपाशी पोहोचते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. बालेकिल्ल्यावर अंजनी मातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे. किल्ल्याच्या पठारावरुन वेतरणा, गंगापूर, मुकणे, दारणा, कश्यपी व गौतमी-गोदावरी धरणाचा विस्तार पाहण्यासारखा असून या गडावरून दिसणारा त्र्यंबक आणि नाशिक शहराचा परिसर सुध्दा आपल्याला भौगोलिक माहिती करून देतो .पावसाळ्यात इथल्या पाय-यांवरून चालताना खुपच कसरत करावी लागते. पहिल्या टप्प्यातल्या डोंगर चढाई त्यानंतर लागणारा पठारी भाग थकवा घालवण्याचं काम करतो. यानंतरची चढाई थोडी अवघड असली तरीपण अनेक स्टॉप पॉईन्ट असल्यामुळे थकवा जाणवत नाही. अंजनेरी पर्वतावर पोहचण्यासाठी जवळपास चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे तुम्ही जर वेगळा विकेण्ड साजरा करण्याच्या मुड़मध्ये असाल तर अंजनेरीचा किल्ला एक उत्तम पर्याय आहे.

माहिती संकलन: प्राची तुंगार

Friday, January 22, 2021

किल्ले, किल्ल्यांचे प्रकार, किल्ल्यांची बांधणी.

 

प्रस्तावना

शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेल्या वास्तू. इंग्रजीत कॅसल, फोर्ट, सिटॅडल, बर्ग वगैरे संज्ञांनी उल्लेख होतो, तर मराठीत दुर्ग, गिरिदूर्ग, द्वीपदुर्ग, जंजिरा, गढी, कोट, गड, बालेकिल्ला वगैरे संज्ञांनी या वास्तूचे वेगवेगळे प्रकार दर्शविले जातात. किल्ल्यांचे बांधकाम व उपयोग फार प्राचीन काळापासून सर्व जगभर होत आला आहे. ज्या काळी अनपेक्षित परचक्राची भीती असे, त्या काळी घरे, मंदिरे, नगरे इ. तटबंदी वा कोट बांधून सुरक्षित ठेवण्याची प्रवृत्ती होती. शत्रूचा हल्ला आल्यास नागरिकांना त्वरित संरक्षण मिळावे व शत्रूशी मुकाबला करण्यास सोयीचे व्हावे, म्हणून बहुतेक नगरे किल्ल्याच्या आसपास किंवा अनेक वेळा किल्ल्यातच वसवीत. नगराप्रमाणे कधी देशाच्या सीमेवरही तटबंदी करीत. चीनची भिंत हे त्याचेच प्रसिद्ध उदाहरण होय. किल्ल्यात पाणीपुरवठा, गुप्त खजिने, धान्यगुदामे, शस्त्रागारे, दारूची कोठारे, गुप्त मार्ग इत्यादींची अत्यंत चातुर्याने व काळजीपूर्वक आखणी करावी लागे. किल्ला अभेद्य रहावा, म्हणून त्या वेळच्या युद्धपद्धतीनुसार बुरूज, दरवाजे, तटबंदी, तटबंद माची, खंदक वगैरेंची रचना करीत. एवढेच नव्हे, तर युद्धप्रसंगी शस्त्रास्त्रे सहजसुलभतेने हाताळता यावीत म्हणूनही काही खास योजना आखण्यात येत.


किल्ल्यांचे प्रकार

प्राचीन पाश्चात्त्य व पौर्वात्य साहित्यात किल्ल्यांचे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत. परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तीनच प्रकार संभवतात, ते म्हणजे भुईकोट किल्ला, गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला आणि द्वीपदुर्ग किंवा जंजिरा. किल्ल्यांच्या स्थानावरून आणि बांधणीच्या पद्धतीवरून अमिलापितार्थचिंतामणी ह्या ग्रंथाचा कर्ता सोमेश्वर ह्याने किल्ल्यांचे नऊ प्रकार पाडलेले आहेत; ते म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग, अश्मदुर्ग, इष्टिकादुर्ग, मृत्तिकादुर्ग, वनदुर्ग, मरूदुर्ग, दारूदुर्ग व नरदुर्ग होत. ह्या प्रत्येकाची बांधणी काही एका विशिष्ट नैसर्गिक परिस्थितीत केलेली असे आणि किल्ल्यांसाठी स्थलसंशोधन करताना दुर्गमता व विपुल जलसंचय यांवर विशेष भर दिला जात असे. बहुतेक भुईकोट किल्ल्यांची रचना दिल्लीचा लाल किल्ला : (१) सलिमगट, (२) जहांगीरने बांधलेला पूल, (३) शाह बुरुज, (४) मोतीमहल, (५) हमामखाना, (६) दीवान-इ-खास, (७) ख्वाबगाह व झरोका, (८) रंगमहल, (९) यमुना नदी, (१०) मुमताजमहल, (११) दीवान-इ-आम, (१२) नौबतखान, (१३) हौद, (१४) कमानी पथ, (१५) असद बुरुज, (१६) शहरपनाह, (१७) मोट (खंदक), (१८) दिल्ली दरवाजा, (१९) द्वारबुरुज, (२०) लहोर दरवाजा, (२१) किल्ल्यातील बाजार.


सपाट जमिनीवर किंवा कृत्रिम छोट्या पठारवजा टेकडीवर केलेली असते. किल्ल्यांचा आकार चौकोनी, गोलाकार, षट्‌कोनी किंवा अष्टकोनीही असतो. किल्ल्याभोवतीचा तट दगडविटा, चुना व माती यांचा वापर करून मजबूत केलेला असतो. काही ठिकाणी तटाबाहेर सभोवती खंदक खणून व त्यात पाणी खेळवून विषारी वनस्पती लावण्यात येते. कधी अल्प अंतरावर दोन किंवा तीन खंदकही असत. पुष्कळदा तटाच्या आतही आणखी एखादी साहाय्यक तटबंदी असे. तटाची उंची सर्वसाधारणतः १० ते १२ मी. वा त्याहून अधिक आणि रुंदी १ मी. पासून ते रथ वा इतर वाहन सहज रीत्या जाऊ शकेल, एवढी आढळते. तटावर बुरूज, मनोरे हयांचेही निरीक्षणाच्या व संरक्षणाच्या दृष्टीने बांधकाम करण्यात येई. गिरिदुर्गाचे बांधकामही ह्या पद्धतीने केले जाई; मात्र तटाची उंची व रुंदी भुईकोटापेक्षा कमी असे. काही ठिकाणी तुटलेल्या कडयाचा उपयोग किरकोळ बांधकाम करून तटासारखा करण्यात येई आणि बांधकामासाठी मुख्यत्वे दगडाचाच उपयोग अधिक करीत. तीच गोष्ट जलदुर्गाच्या बाबतीत आढळते. मात्र जलदुर्गाचे तट अधिक रूंद व शिसे अथवा चुना ह्यांचा उपयोग करून अधिक मजबूत करण्यात येत. बहुधा सतत धडकणाऱ्या पाण्याच्या लाटांपासून किल्ल्याच्या तटांना तडा जाऊ नये, हा त्यामागील उद्‌देश असे. एकूण वरील प्रकारे किल्ल्यात बुरूज, मेट (पहारा), चिलखत (बुरूजामागील संरक्षक फळी-भिंत), पडकोट (बाहेरील भिंत), मनोरे ह्यांबरोबरच गढी, माची (संरक्षणाचा एक भाग, खलबतखाना (गुप्त गोष्टींची खोली), अंबारखाना (धान्य कोठार), बालेकिल्ला वगैरे महत्त्वाच्या वास्तू असत. किल्ल्यांच्या दरवाजांना व बुरूजांना किल्ल्याच्या बांधणीत अनन्यसाधारण महत्त्व असे. कारण संरक्षणाच्या दृष्टीने ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत. दरवाजे लाकडी व लोखंडी पट्‌ट्यांनी मजबूत केलेले असत व त्यांवर अणकुचीदार मेखा किंवा खिळे लावलेले असत. दरवाजे एक किंवा अधिक असत व शिवाय चोरदिंड्या किंवा दिंडी दरवाजे असत. आत आडणे (अडसर) असत. दरवाजांना दिशासूचक नावे दिलेली असत. शिवाय विघ्नहारक व यशदायक अशा सूर्य, चंद्र, गणपती इत्यांदीच्या आकृती दरवाज्यांच्या गणेशपट्‌टीवर मध्यभागी वसविलेल्या असत खेरीज विहिरी, बाजारपेठ, राहण्याची घरे, राजवाडा, मंदिर, सभागृह, तुरूंग इ. लहानमोठ्या वास्तू असत. किल्ल्याच्या बांधणीत चुना, दगड, वीट, माती, लोखंड व लाकूड ह्यांचा सर्रास वापर केलेला दिसतो. दरवाजासाठी आणि इतर बांधकामात लाकडाचा उपयोग करीत, परंतु मध्ययुगात बंदुकीच्या दारूचा शोध लागल्यानंतर लाकडाचा उपयोग हळूहळू कमी होत गेला. बाण व बंदुका यांसाठी बुरूज व तट छिद्रे ठेऊन तयार करीत. या छिद्रांना जंग्या म्हणत. बंदुका येथे खोचून शत्रूवर मारा केला जाई. त्यांवरील सपाट जागा तोफ डागण्यासाठी वापरीत. बुरूजांना देखील नावे दिली जात. गिरिदुर्गाच्या बांधणीत दगडाचाच उपयोग अधिक दिसतो. एकंदरीत बदलत्या कालमानाप्रमाणे आणि शस्त्रास्त्रांतील सुधारणांबरोबर किल्ल्यांचे स्वरूप बदलून ते सचिवालय, राजवाडे, करमणुकीची पटांगणे आणि क्रीडांगणे, अतिथिगृहे, बागा, प्रेक्षागृहे, हमामखाने अशा विविध सुखसोयींनी सज्ज करण्यात आले.

किल्ल्यांचा इतिहास

किल्ल्यांची बांधणी जगात प्रथम केव्हा सुरू झाली, ह्याचा इतिहास ज्ञात नाही.  ईजिप्शियन संस्कृतीच्या (३५०० ते ६०० इ. स. पू.) काळात राजवाडे तटबंदीने, बुरूजांनी व त्याभोवतीच्या खंदकांनी सुरक्षित केलेले असत. बाराव्या राजवंशाच्या वेळी (२०००—१७८६ इ. स. पू.) सेम्ना हा किल्ला बांधण्यात आला. तीच परंपरा पुढे चालू राहिली. ऍसिरियात (इ. स. पू. आठवे-सातवे शतक) तर शहरांना तटबंदी करीत.  खोर्साबाद हे त्यातील प्रसिद्ध शहर होय.  बॅबिलोनियातही (१८००—५०० इ. स. पू.) ह्याच पद्धतीने तटबंदी करून शहरे बसविली जात.  ग्रीकांचा (इ. स. पू. सहावे-पाचवे शतक) टायरिन्झ हा बालेकिल्ला, तसेच अक्रॉपलिस हा अथेन्समधील किल्ला प्रसिद्ध आहे.  पुढे रोमन काळात किल्ल्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले व राजवाडे म्हणजे लहानमोठे भुईकोट किल्लेच तयार होऊ लागले. यूरोपमधील बहुतेक किल्ल्यांच्या बांधणीत ग्रीको-रोमन तसेच गॉथिक वास्तुशैली मुख्यत्वे आढळते. यूरोपात १००० ते १५०० या कालखंडात किल्ल्यांचे प्रमाण वाढले; ते नॉर्मनांच्याच प्रोत्साहनामुळे झाले. शिवाय ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरंजामशाही व धर्मयुद्धे. त्यामुळे हेडिंगहॅम, कोल्चेस्टर, पेम्ब्रोक, डील, केनिलवर्थ, कॉन्वे, ऍरंडल, डोव्हर, एडिनबर, विंझर (इंग्लंड), कूसी-ल-शातो, दे शाँबॉर (फ्रान्स), ब्रॉनफेल्स (जर्मनी), म्युरेन (नेदर्लंड्‌स), सांत आंजीलो (इटली), आल्काथार (स्पेन), रूमेली हिस्सार (तुर्कस्तान), क्रॅक डेस शिव्हॅलिअर्स (सिरिया), कौंतस ऑफ लेंडर्स (बेल्जियम), कल्मार (स्वीडन) ह्यांसारखे प्रसिद्ध किल्ले ह्या युगात बांधले गेले.  ह्यांतच पुढे काही सुधारणा करण्यात आल्या आणि आयलिन डोनान, ऍरंडल, ब्लार्ना, कर्नारव्हन, गेलर्ड वगैरे काही किल्ले; तसेच मेझन्स, लाफीत, शनाझो, आझे-ल-रिदो वगैरे प्रबोधनकाळातील किल्ल्यांची डागडुजी करण्यात आली.  पहिल्या महायुद्धात काही किल्ले जमीनदोस्त झाले.  अद्यापि ह्यांतील अनेक किल्ल्यांचे अवशेष पहावयास सापडतात.  रशियातील क्रेमलिन हे अशा बालेकिल्ल्यांचे उदाहरण म्हणावे लागेल.

नवीन किल्ल्यांची बांधणी

किल्ल्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय वाङ्‌मयात आढळतो. ऋग्वेद, मनुस्मृति, कौटिलीग अर्थशास्त्र, महाभारत (शांतिपर्व), पुराणे ह्यांसारख्या ग्रंथांतून दुर्ग, त्यांचे प्रकार आणि महत्त्व ह्यांचे विवेचन आढळते. प्राचीन भारतात सिंधु नदीच्या खोऱ्यात हडप्पा ह्या शहरास तटबंदी होती व शहराच्या मध्यभागी बालेकिल्ला बांधला होता, असे तेथील अवशेषांबरून दिसते. पुढे वेदकाळात, तसेच ब्राह्मणकाळात शहरांभोवती तटबंदी उभारून सभोवती खंदकांची योजना केली जात असे.  ऋग्वेदात ह्याचा `पुर' ह्या शब्दाने उल्लेख केलेला आढळतो.  ऐतरेय ब्राह्मणात अनेक किल्ल्यांचा उल्लेख असून तीन अग्नी हे तीन किल्ले असून असुरांपासून यज्ञाचे संरक्षण करीत आहेत, असे वर्णन केले आहे.  मौर्यकाळात कौटिलीय अर्थशास्त्रातील किल्ल्यांच्या स्थापत्यविषयक वर्णनावरून असे दिसते, की किल्ल्यांची बांधणी एका विशिष्ट पद्धतीने करण्यात येई.  पाटलिपुत्र शहराच्या अवशेषांवरून असे दिसते, की त्याभोवती खंदक होता आणि त्याची तटबंदी भक्कम असावी.  गुप्त, वाकाटक, राष्ट्रकुट ह्यांच्या काळात किल्ल्यांस विशेष महत्त्व आलेले नसले, तरी त्यांचे राजवाडे व शहरे तटबंदीने युक्त असत. मुसलमानपूर्व काळात चालुक्य, शिलाहार, यादव ह्या वंशांच्या वेळी गिरिदुर्गांचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले.  एकूण किल्ल्यांपैकी ह्या काळात बांधलेले किल्ले-त्यांचे मूळ स्वरूप आज दिसत नसले तरी-संख्येने सर्वाधिक भरतील. देवगिरी (दौलताबाद), साल्हेर-मुल्हेर, अंकाई-टंकाई, अंजनेरी, मार्कंडा, त्रिंबक, रांगणा, पावनगड, पन्हाळा, विशाळगड हे मुसलमानपूर्वकाळातील किल्ले होत.  पुढे मुसलमान काळात अनेक किल्ले बांधण्यात आले.  दिल्लीचा लाल किल्ला, आग्र किल्ला, अहमदनगरचा किल्ला, विजापूरचा किल्ला, बंगलोरचा किल्ला ही तत्कालीन भुईकोट किल्ल्यांची प्रसिद्ध उदाहरणे होत.  तत्कालीन राजपुतांनी चितोड, आंबेर, जोधपूर, ग्वाल्हेर इ. डोंगरी किल्ले बांधले.  सतराव्या शतकात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले आणि काही जुने किल्ले डागडुजी करून इमारती, तळी, तटबंदी यांची योजना करून लढाऊ बनविले. राजगड, रायगड, पुरंदर, तोरणा, विशाळगड, पन्हाळा, प्रतापगड इ. डोंगरी किल्ले व सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जयदुर्ग, खांदेरी, सुवर्णदुर्ग, अरनाळा, कुलाबा, जंजिरा, पद्‌मदुर्ग, जयगड इ. जलदुर्ग होत.  पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले,बांधलेल्या किल्ल्यांचीच डागडुजी करण्यात आली.  मात्र ह्यावेळी यूरोपीय वसाहतवाद्यांनी भारताच्या भूमीवर पाय रोवले होते.  त्यांनी स्वसंरक्षणासाठी फोर्ट विल्यम, फोर्ट सेंट जॉर्ज, फोर्ट सेंट डेव्हिड, आग्वाद त्रांकेबार वगैरे किल्ले बांधले.  ह्या काळात गोवळकोंडा, त्रिचनापल्ली, पेनुगोंडे, चंद्रगिरी येथील किल्ल्यांनाही महत्त्व प्राप्त झाले.


वरील काळात राजधानीच्या शहराव्यतिरिक्त जहागीरदार-वतनदारांच्या गावात, त्या त्या वतनदारांनी बांधलेल्या गढ्या या किल्ल्यांच्या छोट्या प्रतिमाच होत.  भारतातील किल्ल्यांच्या बांधणीत नॉर्मंडी येथे बांधलेल्या किल्ल्यांच्या रचनेची तसेच सॅरसेनिक वास्तुशैलीची छाप आढळते व तीच पुढे महाराष्ट्रातील किल्ल्यांवर पडलेली दिसते.


विसाव्या शतकात शस्त्रास्त्रांच्या व वाहनांच्या आधुनिकीकरणाबरोबर किल्ल्यांचे महत्त्व संपुष्टात आले.  दुसऱ्या जागतिक महायुद्धात १९३८ मध्ये जर्मनीने सिगफ्रीड लाइन व फ्रान्सने मॅझिनो लाइन ह्यांसारख्या अवाढव्य तटबंद्या बांधल्या.  रणगाडे, अणुबाँब ह्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून तळघरात किल्ले बांधले जाण्याची शक्यता आहे.


१) कृ. ब. गटणे

२) सु. र. देशपांडे



Thursday, January 21, 2021

किल्ले रायगड, महाराष्ट्र.

 

किल्ले रायगड

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ. गडकोट म्हणजे खजिना. गडकोट म्हणजे सैन्याचे मूळ. गडकोट म्हणजे राज्य लक्ष्मी. गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे रामचंद्रपंत अमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रात लिहिले होते.

हे सारेच्या सारे वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वच किल्ल्यांसाठी आहे. तथापि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या किल्ले रायगडला तर ते तंतोतंत लागू पडते. रायगड-अलिबाग जिल्ह्यात असलेल्या या किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक, शिवप्रेमी भेट देऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतात आणि नवप्रेरणा घेऊन मोठ्या उत्साहात छत्रपतींचे गुणगाण गातात. अगदी दोन दिवसाची सुट्टी लक्षात घेऊन आपण गडकिल्ले रायगडवर जाऊन याची देही याची डोळा महाराष्ट्राची अस्मिता हृदयात साठवू शकतो. त्यासाठीची ही थोडक्यात माहिती... महाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला हा कोकणाच्या ऐतिहासिक वैभवाची महत्वपूर्ण साक्ष म्हणून मोठ्या गौरवाने अलिबाग-रायगड जिल्ह्यात लाखो पर्यटकांना शिववैभवाची व शिवपराक्रमाची कहाणी सांगत उभा आहे.

६ जून १६७४ रोजी याच किल्ल्यावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्याची ही एक महत्वपूर्ण घटना असून महाराजांची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे . महाड या शहरापासून अवघ्या २४ कि.मी. अंतरावर पाचाड हे गाव आहे.

या गावात राजमाता जिजाऊंचा वाडा, समाधी हे पवित्र तिर्थस्थळ आहे. येथील दर्शनाने मन शांत होऊन किल्ला रोहणास सुरूवात करता येते. पाचाडच्या चित्त दरवाज्यापासून ३ कि.मी. अंतरावर रायगड किल्ला आहे. रायगडावर चढण्यासाठी १४५०  पायऱ्या चढून जावे लागते. यासाठी साधारण दोन तास सहज लागू शकतात. तथापि सध्या रायगडावर जाण्यासाठी ‘रोपवे’ची व्यवस्था झाली आहे.

महादरवाजा


रायगडावर पाहण्यासारखी बरीच स्थळे आहेत. त्यात होळीचा माळ, भवानी मंदिर, चित्त दरवाजा, खुबलढा बुरुज, महादरवाजा, मेणादरवाजा, राणीवसा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा, गंगासागर तलाव, नगारखाना, जगदिश्वर मंदिर, बारा टाकी, वाघ दरवाजा, टकमक टोक, रामेश्वर मंदिर व शिवछत्रपती समाधी इत्यादी ठिकाणे आहेत. महाराजांच्या होळी माळावरील सिंहासनाधीश्वर पुतळा दारुची कोठारे अशीही अनेक स्थळे नजरेत व हृदयात साठवण्यासारखी आहेत.राजधानीस आवश्यक असलेले गुण किल्ले रायगडमध्ये शिवरायांना आढळले. त्यामुळेच त्यांनी या गडाची राजधानी म्हणून निवड केली. प्रचंड उंची, वर जाण्याचा एकच मार्ग, अतिशय विस्तृत पठार या सर्व गोष्टीबरोबरच रायगडाची समुद्राशी असलेली जवळीक, आणखी काय हवे होते. दुरदृष्टीपणा हा महाराजांचा महत्वपूर्ण गुण. त्याचीच साक्ष या किल्ल्याची निवड सहजतेने देते.

जगदिश्वर मंदिर


हिरोजी इंदुलकर यांना रायगडावर राजधानी करण्यासाठी बांधकाम करण्यास महाराजांकडून आदेश प्राप्त झाला आणि आपले संपूर्ण कसब पणाला लावून त्यांनी या किल्ल्यावर राजसभा, राजनिवास, न्यायसभा, कल्याणसभा, विवेक सभा, दारु कोठारे, अंबरखाने, मंत्र्यांची निवासस्थाने, कचेऱ्या, नगरपेठ, किर्तीस्तंभ, तलाव, मंदिरे, खलबतखाना, हत्तीशाळा, अश्वशाळा वस्त्रागार, रत्नागार, जगदीश्वर प्रासाद, करमणुकीची स्थाने याबरोबरच गडाच्या संरक्षण व्यवस्थेतील कडे तासणे, तटबंदी बांधणे, महाद्वार आणि बुरुज, चोरवाटा उभारल्या.

हिरोजी इंदुलकर यांची स्वामिनीष्ठा


किल्ल्यावर जाण्यासाठी चढण सुरू करताच काही वेळात उजव्या बाजूस खुबलढा बुरुज लागतो. पायथ्यांच्या खिंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही बुरुजाची जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. इथून पुढे जाताना डाव्या बाजूस उंच कडा दिसतो ते टकमक टोक आणि उजव्या बाजूस हिरकणी टोक दिसते. महाद्वाराकडे जाण्यासाठी दुसरी वाट नाना दरवाज्यातून जाते. मात्र उंच चढण व उंच पायऱ्या यामुळे ही वाट परीक्षा पहाते. दोन बुलंद बुरुजांच्या मध्ये असणाऱ्या या महाद्वाराची बांधणी अतिशय मजबूत आहे.

काळ्या दगडांची ही सुबक बांधणी आतल्या अंगास पहारेकऱ्यांच्या देवड्यांनी युक्त आहे. दरवाज्याच्या कमानीवर दोन्ही बाजूस राजसत्तेचे प्रतिक असलेले सिंहासारखे शरभ हे प्राणी कोरलेले आहेत.

पुढे गेल्यावर आपणास एक तलाव दिसतो हाच तो हत्ती तलाव. तेथून काही अंतरावर आणखी एक भव्य भव्य असा गंगासागर तलाव दिसतो. एका बाजूने चिरेबंदी दगडी बांधणीने बंदिस्त केलेला हा तलाव आजही रायगडावरील पाणीपुरवठयाचे काम करतो. पुढे महाराजांचा राजवाडा, राणीवसा ओलांडून आपण सिंहासनाच्या चौथऱ्यापाशी येतो. येथे धातूच्या सुंदर नक्षीकामाने मढविलेली मेघडंबरी आहे.

येथेच समोरील बाजूस नगारखान्याची इमारत असून सिंहासन ते नगारखाना जवळपास १६० फुटाचे अंतर आहे. मात्र नगारखान्याजवळ बोललेले सिंहासनाजवळ उभे राहिल्यासही स्पष्ट ऐकू येते. पुढे होळीचा माळ तसेच तेथे असलेला शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा, माळाच्या डाव्या बाजूस असलेले शिकाई मंदिर, पुढे बाजारपेठ आणि जगदीश्वराचे मंदिर, दरम्यान डावीकडे असलेले टकमक टोक शिववैभवाची साक्ष देत शिवभक्तांना प्रेरणा देत उभे आहेत. जगदीश्वराच्या पुढील बाजूस छत्रपतींची समाधी आहे. आलेला प्रत्येक शिवभक्त हा येथे नतमस्तकच होतो आणि शिवसमाधीचे तेजस्वी स्वरुप नजरेत भरुन पावतो.

शिव समाधी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवडता कुत्रा वाघ्याची समाधी

कसे जाल?

विमान -

सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र.


 रेल्वे-

बहुतेक पर्यटनस्थळांसाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके मुंबई (सीएसटी), एलटीटी, कुर्ला टर्मिनस, पुणे रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्थानक (रायगड जिल्ह्यातील) भारतीय रेल्वेच्या मुख्य मार्गासाठी आहेत.  रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वेची सर्वात जवळची रेल्वे स्थानके पेण, रोहा, वीर इत्यादी आहेत. पर्यटक त्यांच्या सोयीनुसार कोकण रेल्वेवरील सर्वात जवळचे स्थानिक रेल्वे स्थानक निवडू शकतात.


 बसने-

 रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरे व पर्यटन स्थळे महाराष्ट्र राज्य रस्ता परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) बसमार्गे रस्त्यांद्वारे जोडली गेली आहेत.  रायगड जिल्हा सायन पनवेल द्रुतगती महामार्गाद्वारे मुंबईला जोडलेला आहे.  पनवेल, खालापूर आणि खोपोली मार्गे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि एनएच ४ जाते.  पनवेल येथून सुरू होणारी एनएच १७ पोलादपूर पर्यंत जाते.


सोयी- गडावर महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाची निवासस्थाने आहेत. शिवाय खाजगी हॉटेलमध्येही निवासाची सोय होऊ शकते. शिवभक्तांनी दोन दिवसांचा वेळ काढून रायगड किल्ल्याचे दर्शन घेण्यास हरकत नाही.

Monday, January 18, 2021

अंबोली घाट, महाराष्ट्र.

आंबोली 


 आंबोली हा महाराष्ट्रात स्थित एक लहान डोंगराळ प्रदेश आहे.  हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍या सह्याद्री पर्वत रांगे  मध्ये आहे. आंबोलीला सन १८८० मध्ये हिल स्टेशनचा दर्जा देण्यात आला.  कुटुंबासह सुट्टी घालविण्याकरिता ही जागा एक उत्तम जागा आहे.  इथले हवामान बहुतेक थंड असते, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात इथे येणे चांगले.


 जर एखाद्या हिल स्टेशनवर पावसाच्या सरींचा आनंद घेतला गेला तर हा अनुभव स्वतःच अनन्य आहे.  'अंबोली' हेदेखील असेच काहीतरी आहे.  हे सुंदर स्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या टेकड्यांच्या दक्षिण रांगेत आहे.  या ठिकाणच्या नेत्रदीपक लँडस्केपमध्ये कोणालाही मोहित करण्याची क्षमता आहे.  बरीच ठिकाणे आहेत ज्यातून प्रत्येक हिरव्यागार पर्वत आणि सुपीक पृथ्वीच्या विहंगम दृश्यांचा आनंद घेऊ शकतो.  सर्व कुटुंबासमवेत सुट्टी वगैरे घालण्यासाठी अंबोली ही योग्य जागा आहे.

 इतिहास

 ब्रिटीश राजवटीदरम्यान, मध्य आणि दक्षिण भारतातील सैनिकांसाठी चौक्या बनविल्या गेल्यापासून आंबोली शहर एक उच्च चौकी म्हणून वापरले जात असे.  सन १८८० मध्ये आंबोली हिल स्टेशन म्हणून घोषित करण्यात आले.  सावंतवाडीतील स्थानिकांना इंग्रजांपूर्वीच या ठिकाणचे सौंदर्य सापडले.  मान्सून हा महाराष्ट्रातील सर्वात पावसाळ्याचे ठिकाण असल्याने, इंग्रजांनी उन्हाळ्यात माथेरानला त्यांचे आवडते ठिकाण बनवले.  परिणामी, महाराष्ट्राच्या नकाशावर बर्‍याच काळापासून आंबोली एक महत्त्वाचे स्थान राहिले. 

 पर्यटन स्थळ 

 अंबोली हे शनिवार व रविवार घालविण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.  यासह, हे एक रोमँटिक ठिकाण देखील आहे.  धावत्या जीवनाचा वेग कमी करण्यासाठी पर्यटक येथे येऊ शकतात.  आंबोली धबधब्यांसाठी नंदनवन आहे.  येथे सापडलेले काही धबधबे काही धबधबे आहेत.

 श्रीगांवकर फॉल्स
 महादेव धबधबा
 नांगरता धबधबा
 नांगरटा धबधबा सहलीसाठी आणि विश्रांतीसाठी उत्कृष्ट ठिकाण आहे.  हिरण्यकेशी जलप्रपात च्या लेण्यांच्या तोंडाजवळ एक लहान प्राचीन शिव मंदिर आहे.  असे मानले जाते की हे मंदिर स्वतः शिव यांनी बनवले आहे.  पार्वतीकडून हिरण्यकेशी मंदिराचे नाव पडले, जे तिच्या नावांपैकी एक आहे.  हिल स्टेशन असल्याने आंबोलीत सी व्ह्यू पॉइंट, कावेलसाद पॉईंट, परीक्षित पॉईंट आणि महादेव पॉईंट अशी अनेक निसर्गरम्य जागा आहेत.  या सर्व ठिकाणी अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीच्या संगमाचे विहंगम दृश्य दिले गेले आहे.

 इतर ठिकाणे 




 आंबोली गावात एक प्राचीन शिव मंदिर आहे, ज्यास 'हिरण्यकेशी' असेही म्हणतात.  येथून पाण्याचा प्रवाह बाहेर पडतो आणि कृष्णा नदीला जोडला.  ही शिव मंदिरे एका गुहेत आहेत आणि हा प्रवाह येथून उगम पावतो.  असे मानले जाते की येथे जवळपास 108 शिव मंदिरे आहेत, परंतु आतापर्यंत त्यापैकी काही मोजकीच उघडकीस आली आहेत.  येथे येणारे पर्यटकही सहलीचा आनंद घेऊ शकतात.  दाट जंगले आणि खोल दरी पासून कोकण किनारपट्टीचे दृश्य देखील खूप सुंदर आहे.  पर्यटकांना या हिल स्टेशनपासून 10 किमी अंतरावर बॉक्साइट खाण देखील दिसू शकते.  पर्यटकांना मासेमारीची आवड असल्यास हिरण्यकेशी येथे काही तासांचा आनंद लुटता येतो.  माधवगड किल्ल्याचे अवशेष येथेही पाहायला मिळतात.  आंबोलीच्या मुख्य रस्त्यावर युद्ध स्मारकही आहे.

 कधी जायचे
 उंच उंचीमुळे इथले हवामान थंड असल्याने येथे उन्हाळ्यात येणे चांगले.  पावसाळ्यात 20 अंश सेल्सिअस तपमान असल्यामुळे या ठिकाणी रहाणे आनंददायक आहे.  हिवाळ्यातसुद्धा इथे येऊन छान वाटेल.  पावसाळ्यात चांगला पाऊस पडत असल्याने येथे असणारा धबधबा आणि धुके नैसर्गिक लँडस्केपचे सौंदर्य वाढवतात.  आंबोली हा पावसाच्या मनोरंजनासाठी आणि काही दिवस एकांतात एक चांगला उपाय आहे.

 कुठे राहायचे

 आंबोलीत काही चांगली आणि स्वस्त हॉटेल आहेत.  यामध्ये हॉटेल 'व्हिसलिंग वुड्स', 'साइलेंट व्हॅली रिसॉर्ट शांती दर्शन' आणि 'हॉटेल शिव मल्हार' यांचा समावेश आहे.  यासह 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ' चे रिसॉर्ट्स येथेही आहेत.  जवळजवळ सर्वच रेस्टॉरंट्स, रूम सर्व्हिस आणि कॅब सर्व्हिस आहेत.

 वाहतूक
 सावंतवाडी आणि गोव्याजवळील अंबोली हवाई, रेल्वे व रस्ते सहज उपलब्ध आहे.  गोव्याचे सर्वात जवळचे विमानतळ  ७० कि.मी. अंतरावर आहे.  सावंतवाडी रेल्वे स्थानक रेल्वेने येण्यासाठी वापरले जाऊ शकते.  रेल्वे स्थानकातून टॅक्सी घेऊन पर्यटक आंबोलीला पोहोचू शकतात.  मुंबई ५५० किलोमीटर आणि पुणे  ४००किलोमीटर लांब असून या दोन शहरांमधूनच नव्हे तर इतर शहरांतून बस उपलब्ध आहेत.

प्रतापगड, महाराष्ट्र

प्रतापगड


 महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला २१ कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. दि.१० नोव्हे.१६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती, त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. सन १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची स्थापना केली. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५४३ फुट उंचीवर हा किल्ला आहे. छ.शिवाजी महाराजांनी’ तुळजा-भवानी’ मातेचे मंदिर या ठिकाणी स्थापले होते. या किल्ल्यावरून कोंकणातील शेकडो किलोमीटर क्षेत्राचे दर्शन घडते.छत्रपती शिवाजी महाराज! ह्यांचे नुसते नाव जरी घेतले तरी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमानाची भावना आणि अंगावर रोमांच उभे राहतात. महाराज म्हणजे समस्त महाराष्ट्राचे खरे तर हिंदू माणसाचे दैवत! त्यांच्यासारखा राजा कधी झाला नाही आणि परत होणारही नाही.राजमाता जिजाऊ ह्यांनी घडवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात अनेक पराक्रम केले. त्यांच्या पराक्रमाची गाथा आजही घराघरांत लहान मुलांना सांगितली जाते. त्यातीलच एका पराक्रमाची गाथा सांगणारा दिवस म्हणजे शिवप्रताप दिन!महाराजांच्या अतुल्य शौर्याची गाथा सांगणारा हा दिवस दर वर्षी प्रतापगडावर साजरा केला जातो. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रूर अफझलखानाचा वध केला तो दिवस आपण शिवप्रताप दिन म्हणून आपण साजरा करतो.प्रतापगडची लढाई माहिती नाही असा मराठी माणूस सापडणे विरळाच! महाराष्ट्राच्या इतिहासातील ही एक अत्यंत महत्वाची लढाई आहे. इतिहासातील सर्वात रोमांचक क्षणांपैकी एक म्हणजे अफझलखानाचा वध होय.हिंदवी स्वराज्यावरील मोठे संकट बनून आलेल्या अफझलखानाला अत्यंत शौर्याने व चतुराईने ठार करून तसेच त्याच्या सैन्याचा पराभव करून महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केले.शिवाजी महाराजांनी त्यांच्या शौर्याने व गनिमी काव्याने अनेक गड, किल्ले व प्रांत जिंकून उत्तरेत मुघलांना तसेच दक्षिणेत आदिलशहाला पळता भुई थोडी केली होती. महाराजांना थांबवण्याचा कुठलाच उपाय मिळत नसल्याने शेवटी आदिलशहाच्या आईने बडी बेगमने विजापूरच्या भर दरबारात आवाहन केले होते की जो सरदार शिवाजी महाराजांना कैद करून आणेल त्याला मोठे इनाम दिले जाईल.ही कामगिरी करणे त्या दरबारातील कुणालाही शक्य वाटले नाही तेव्हा एक उंच धिप्पाड सरदार पुढे आला व त्याने ही कामगिरी करण्याचा विडा उचलला.तो सरदार होता क्रूर, धूर्त अफझल खान! त्याला हरविणे इतके सोपे नव्हते. तो आदिलशाहीतील एक उत्तम योद्धा होता व सर्व रणनीतींमध्ये पारंगत होता.अफझलखानाने शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजांची ह्यांची हत्या केली होती आणि आदिलशाही दरबारात त्याचे व शहाजी राजांचे वैर होते. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून अफझलखान मोठे सैन्य घेऊन विजापूर हुन १६५९ साली निघाला.अफझलखानाच्या सैन्यात सिद्दी हिलाल, मुसाखान, अंबरखान, याकूतखान तसेच प्रतापराव मोरे, पिलाजी मोहिते हे मोठ मोठे पराक्रमी सरदार होते.तसेच बारा हजार घोडदळ, दहा हजार पायदळ, अनेक तोफा व बंदूकधारी सैनिक सुद्धा होते.


मजल दरमजल करत येत असताना त्याने इस्लामी प्रथेप्रमाणे अनेक देवळे उध्वस्त केली, मूर्तिभंजन केले. गावातील लोकांवर अत्याचार केले.शिवाजी महाराजांनी खानाच्या येण्याची बातमी ऐकल्यावर त्यांचा मुक्काम राजगडावरून दुर्गम असलेल्या घनदाट जंगलातील प्रतापगडावर हलवला. अफझलखानाने तुळजापूरच्या भवानी मंदिराचा विध्वंस केला आणि नंतर त्याने आपला रोख महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या देवळाकडे वळवला.त्याचा असा कावा होता की अश्या प्रकारे देवळे उध्वस्त केल्यावर शिवाजी महाराज चिडतील आणि त्याच्याशी युद्ध करायला मैदानात उतरतील.


परंतु महाराजांनी गनिमी कावा खेळत बचावात्मक पवित्रा घेतला. खानाने जंजिऱ्याच्या सिद्दीशी हातमिळवणी केली आणि कोकणच्या बाजूने सुद्धा आपली पकड मजबूत केली.खानाने हळूहळू पुढे प्रवास करीत वाई येथे मुक्काम टाकला. त्याला ह्या प्रदेशाची चांगली माहिती होती कारण पूर्वी तो वाईचा सुभेदार होता. ह्या ठिकाणहुन त्याला खेळी खेळणे सोपे जाईल म्हणून त्याने वाईलाच मुक्काम ठोकला. युद्धाच्या आधीच शिवाजी महारांना ठार मारायचा खानाचा कावा होता.शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असे महाराजांचे मत असल्याने त्यांनी गनिमी काव्याने खानाचा हल्ला परतवण्याचे ठरवले. शिवाय युद्धात नुकसात झाले असते म्हणून महाराजांनी खानाकडे आपले दूत पाठवले व त्याला आपण घाबरलो असल्याचे दाखवले.


आपण घाबरलो आहोत व आपल्याला युद्ध करायचे नाही उलट तह किंवा समझोता करायचा आहे हे दूतांकरवी खानाला कळवले.खानाने महाराजांना वाईला भेटायला बोलावले. परंतु महाराजांनी वाईस जाण्यास नकार दिला कारण घातपात होण्याची दाट शक्यता होती. म्हणूनच महाराजांनी आपण फारच घाबरलो असल्याचे भासवत खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट घेण्यास सांगितले. खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यास तयार झाला.भेटीदरम्यान दोन्ही पक्ष कुठलेही हत्यार वापरणार नाही असा नियम ठरला. प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील आणि त्यातील एक शामियान्याच्या बाहेर थांबेल व इतर अंगरक्षक लांब राहतील असे ठरले.


भेटीचा दिवस १० नोव्हेंबर १६५९ हा ठरला.भेटीच्या दिवशी अफझलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजी महाराजांनी जाणूनबुजून अतिशय भव्य आणि सुंदर शामियाना तयार करवून घेतला होता. नि:शस्त्र भेटायचे ठरले होते तरीही खानाने दगा करण्याचे ठरवले असल्याने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता.खान शंभर टक्के दगाफटका करणार हे महाराजांना ठाऊक असल्याने त्यांनी अंगरख्याखाली चिलखत घातले होते आणि वाघनखे हातात लपवली होती. महाराज शामियानात आल्यानंतर अफझलखानाने महाराजांना आलिंगन देण्यास बोलावले.उंच धिप्पाड अफझलखान आणि मूर्ती लहान पण महान कीर्ती असलेले महाराज आलिंगन देण्यास सरसावले. धिप्पाड अफझलखानाने महाराजांना आलिंगन देताच आपल्या काखेत दाबून महाराजांवर बिचव्याचा वार केला.


परंतु महाराजांनी चिलखत घातलेले असल्याने त्यांना काहीही इजा झाली नाही आणि खानाने दगा केल्याने महाराजांनी वाघनखे काढली आणि खानाच्या पोटात खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला.अनपेक्षित हल्ल्याने घाबरलेल्या खानाने ‘दगा दगा” असा आक्रोश केला. त्यामुळे त्याचे अंगरक्षक सावध झाले. इतर अंगरक्षक व महाराजांचे अंगरक्षक ह्यांच्यात लढाई जुंपली. सय्यद बंडाने महाराजांवर वार केला परंतु जिवा महालाने तो वार आपल्यावर झेलला आणि महाराजांचा रास्ता मोकळा केला.खान जखमी अवस्थेत त्याच्या पालखीत स्वर झाला परंतु संभाजी कावजीने पालखी वाहणाऱ्या भोईंच्या पायांवर वार केला आणि जखमी अफझलखानाला ठार करून त्याचे शीर धडापासून वेगळे केले.


महाराजांनी त्याचे हे शीर जिजाऊंना भेट म्हणून पाठवले. महाराजांन नंतर लगेच किल्ल्यावर परत गेले आणि तोफांनी सैन्याला अफझलखानाच्या सैन्यावर आक्रमण करण्याचे आदेश दिले.महाराजांच्या सैन्याच्या तुकड्या प्रतापगडाच्या घनदाट जंगलात आधीच दबा धरून बसल्या होत्या. तोफांचे आवाज ऐकताच त्यांनी अफझलखानाच्या सैन्यावर आक्रमण केले.खानाचे सैन्य बेसावध होते. कान्होजी जेधे ह्यांनी बंदूकधार्यांवर आक्रमण केले. मुसाखान पळून गेला. अफझलखानाच्या सैन्याची वाताहत झाली. सुमारे ५००० सैनिक मारले गेले आणि ३००० सैनिक युद्धबंदी म्हणून पकडले गेले आणि आदिलशाहीच्या सैन्याचा दारुण पराभव झाला.परंतु महाराजांच्या सैन्याने कुणावरही अत्याचार केले नाहीत. हाच मराठे व इतर ह्यांच्यातला मोठा फरक होता.


अशी ही महाराजांची शौर्यगाथा जिच्या स्मरणार्थ शिवप्रताप दिन साजरा केला जातो.

आदिवासी क्षेत्रातील किल्ले

आदिवासी क्षेत्रातील किल्ले  महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील ठाणे, पालघर तसेच उत्तरेकडील नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आदिवासीबहुल भाग ...