Thursday, January 21, 2021

किल्ले रायगड, महाराष्ट्र.

 

किल्ले रायगड

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ. गडकोट म्हणजे खजिना. गडकोट म्हणजे सैन्याचे मूळ. गडकोट म्हणजे राज्य लक्ष्मी. गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे रामचंद्रपंत अमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रात लिहिले होते.

हे सारेच्या सारे वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वच किल्ल्यांसाठी आहे. तथापि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या किल्ले रायगडला तर ते तंतोतंत लागू पडते. रायगड-अलिबाग जिल्ह्यात असलेल्या या किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक, शिवप्रेमी भेट देऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतात आणि नवप्रेरणा घेऊन मोठ्या उत्साहात छत्रपतींचे गुणगाण गातात. अगदी दोन दिवसाची सुट्टी लक्षात घेऊन आपण गडकिल्ले रायगडवर जाऊन याची देही याची डोळा महाराष्ट्राची अस्मिता हृदयात साठवू शकतो. त्यासाठीची ही थोडक्यात माहिती... महाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला हा कोकणाच्या ऐतिहासिक वैभवाची महत्वपूर्ण साक्ष म्हणून मोठ्या गौरवाने अलिबाग-रायगड जिल्ह्यात लाखो पर्यटकांना शिववैभवाची व शिवपराक्रमाची कहाणी सांगत उभा आहे.

६ जून १६७४ रोजी याच किल्ल्यावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्याची ही एक महत्वपूर्ण घटना असून महाराजांची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे . महाड या शहरापासून अवघ्या २४ कि.मी. अंतरावर पाचाड हे गाव आहे.

या गावात राजमाता जिजाऊंचा वाडा, समाधी हे पवित्र तिर्थस्थळ आहे. येथील दर्शनाने मन शांत होऊन किल्ला रोहणास सुरूवात करता येते. पाचाडच्या चित्त दरवाज्यापासून ३ कि.मी. अंतरावर रायगड किल्ला आहे. रायगडावर चढण्यासाठी १४५०  पायऱ्या चढून जावे लागते. यासाठी साधारण दोन तास सहज लागू शकतात. तथापि सध्या रायगडावर जाण्यासाठी ‘रोपवे’ची व्यवस्था झाली आहे.

महादरवाजा


रायगडावर पाहण्यासारखी बरीच स्थळे आहेत. त्यात होळीचा माळ, भवानी मंदिर, चित्त दरवाजा, खुबलढा बुरुज, महादरवाजा, मेणादरवाजा, राणीवसा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा, गंगासागर तलाव, नगारखाना, जगदिश्वर मंदिर, बारा टाकी, वाघ दरवाजा, टकमक टोक, रामेश्वर मंदिर व शिवछत्रपती समाधी इत्यादी ठिकाणे आहेत. महाराजांच्या होळी माळावरील सिंहासनाधीश्वर पुतळा दारुची कोठारे अशीही अनेक स्थळे नजरेत व हृदयात साठवण्यासारखी आहेत.राजधानीस आवश्यक असलेले गुण किल्ले रायगडमध्ये शिवरायांना आढळले. त्यामुळेच त्यांनी या गडाची राजधानी म्हणून निवड केली. प्रचंड उंची, वर जाण्याचा एकच मार्ग, अतिशय विस्तृत पठार या सर्व गोष्टीबरोबरच रायगडाची समुद्राशी असलेली जवळीक, आणखी काय हवे होते. दुरदृष्टीपणा हा महाराजांचा महत्वपूर्ण गुण. त्याचीच साक्ष या किल्ल्याची निवड सहजतेने देते.

जगदिश्वर मंदिर


हिरोजी इंदुलकर यांना रायगडावर राजधानी करण्यासाठी बांधकाम करण्यास महाराजांकडून आदेश प्राप्त झाला आणि आपले संपूर्ण कसब पणाला लावून त्यांनी या किल्ल्यावर राजसभा, राजनिवास, न्यायसभा, कल्याणसभा, विवेक सभा, दारु कोठारे, अंबरखाने, मंत्र्यांची निवासस्थाने, कचेऱ्या, नगरपेठ, किर्तीस्तंभ, तलाव, मंदिरे, खलबतखाना, हत्तीशाळा, अश्वशाळा वस्त्रागार, रत्नागार, जगदीश्वर प्रासाद, करमणुकीची स्थाने याबरोबरच गडाच्या संरक्षण व्यवस्थेतील कडे तासणे, तटबंदी बांधणे, महाद्वार आणि बुरुज, चोरवाटा उभारल्या.

हिरोजी इंदुलकर यांची स्वामिनीष्ठा


किल्ल्यावर जाण्यासाठी चढण सुरू करताच काही वेळात उजव्या बाजूस खुबलढा बुरुज लागतो. पायथ्यांच्या खिंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही बुरुजाची जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. इथून पुढे जाताना डाव्या बाजूस उंच कडा दिसतो ते टकमक टोक आणि उजव्या बाजूस हिरकणी टोक दिसते. महाद्वाराकडे जाण्यासाठी दुसरी वाट नाना दरवाज्यातून जाते. मात्र उंच चढण व उंच पायऱ्या यामुळे ही वाट परीक्षा पहाते. दोन बुलंद बुरुजांच्या मध्ये असणाऱ्या या महाद्वाराची बांधणी अतिशय मजबूत आहे.

काळ्या दगडांची ही सुबक बांधणी आतल्या अंगास पहारेकऱ्यांच्या देवड्यांनी युक्त आहे. दरवाज्याच्या कमानीवर दोन्ही बाजूस राजसत्तेचे प्रतिक असलेले सिंहासारखे शरभ हे प्राणी कोरलेले आहेत.

पुढे गेल्यावर आपणास एक तलाव दिसतो हाच तो हत्ती तलाव. तेथून काही अंतरावर आणखी एक भव्य भव्य असा गंगासागर तलाव दिसतो. एका बाजूने चिरेबंदी दगडी बांधणीने बंदिस्त केलेला हा तलाव आजही रायगडावरील पाणीपुरवठयाचे काम करतो. पुढे महाराजांचा राजवाडा, राणीवसा ओलांडून आपण सिंहासनाच्या चौथऱ्यापाशी येतो. येथे धातूच्या सुंदर नक्षीकामाने मढविलेली मेघडंबरी आहे.

येथेच समोरील बाजूस नगारखान्याची इमारत असून सिंहासन ते नगारखाना जवळपास १६० फुटाचे अंतर आहे. मात्र नगारखान्याजवळ बोललेले सिंहासनाजवळ उभे राहिल्यासही स्पष्ट ऐकू येते. पुढे होळीचा माळ तसेच तेथे असलेला शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा, माळाच्या डाव्या बाजूस असलेले शिकाई मंदिर, पुढे बाजारपेठ आणि जगदीश्वराचे मंदिर, दरम्यान डावीकडे असलेले टकमक टोक शिववैभवाची साक्ष देत शिवभक्तांना प्रेरणा देत उभे आहेत. जगदीश्वराच्या पुढील बाजूस छत्रपतींची समाधी आहे. आलेला प्रत्येक शिवभक्त हा येथे नतमस्तकच होतो आणि शिवसमाधीचे तेजस्वी स्वरुप नजरेत भरुन पावतो.

शिव समाधी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवडता कुत्रा वाघ्याची समाधी

कसे जाल?

विमान -

सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र.


 रेल्वे-

बहुतेक पर्यटनस्थळांसाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके मुंबई (सीएसटी), एलटीटी, कुर्ला टर्मिनस, पुणे रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्थानक (रायगड जिल्ह्यातील) भारतीय रेल्वेच्या मुख्य मार्गासाठी आहेत.  रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वेची सर्वात जवळची रेल्वे स्थानके पेण, रोहा, वीर इत्यादी आहेत. पर्यटक त्यांच्या सोयीनुसार कोकण रेल्वेवरील सर्वात जवळचे स्थानिक रेल्वे स्थानक निवडू शकतात.


 बसने-

 रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरे व पर्यटन स्थळे महाराष्ट्र राज्य रस्ता परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) बसमार्गे रस्त्यांद्वारे जोडली गेली आहेत.  रायगड जिल्हा सायन पनवेल द्रुतगती महामार्गाद्वारे मुंबईला जोडलेला आहे.  पनवेल, खालापूर आणि खोपोली मार्गे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि एनएच ४ जाते.  पनवेल येथून सुरू होणारी एनएच १७ पोलादपूर पर्यंत जाते.


सोयी- गडावर महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाची निवासस्थाने आहेत. शिवाय खाजगी हॉटेलमध्येही निवासाची सोय होऊ शकते. शिवभक्तांनी दोन दिवसांचा वेळ काढून रायगड किल्ल्याचे दर्शन घेण्यास हरकत नाही.

No comments:

Post a Comment

आदिवासी क्षेत्रातील किल्ले

आदिवासी क्षेत्रातील किल्ले  महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील ठाणे, पालघर तसेच उत्तरेकडील नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आदिवासीबहुल भाग ...